Monday, September 3, 2018

नाशिकचं दुर्गसाम्राज्य


नाशिकचं दुर्गसाम्राज्य (Forts of Nasik)
न नासिकसमं तीर्थं, न नासिकसमं पुरम्
न नासिकसमं क्षेत्रं, न नासिकसमं स्थलम्
-अर्थात नाशिकसारखं तीर्थ, शहर, क्षेत्र आणि स्थळ कुठेही नाही, असं महात्म्य पौराणिक ग्रंथांपासून ते आजच्या नव्या पर्यटन पुस्तकांत मांडलेलं दिसतं. महाराष्ट्रातल्या संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गडकोटांच्या बाबतीतही वरील उक्तिप्रमाणे नाशिकचे महत्त्व काही अलगच असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नाशिक जिल्ह्यातल्या गिरीडोंगरात आपल्याला अगदी सपाट टेकड्यांपासून ते उत्तुंग शिखरांपर्यंत सर्व उंचीचे पर्वत पहायला मिळतात. अगदी मुरमाड व घसरड्या वाटा असलेले तसंच राकट असे उभे दगडी कडे व सुळके असलेले असे दोन्हीही प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या डोंगराच्या बाबतीत दिसून येतात. कईक किलोमिटरचा घेरा असलेले तसंच अगदी अरुंद घेर्‍यात जागेवरच उठावलेले, उभे-आडवे अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकार, दाट झाडीचे तर अगदीच उघडेबोडके असे किती प्रकार सांगावे असा विविधांगी गिरीठेवा नाशिककडे आहे. त्यामुळेच अनेक गिर्यारोहकांचा नाशिककडे विशेष ओढा असल्याचं दिसतं.
सह्याद्री पर्वतरांग साधारण सापुतार्‍याकडील डांगपासून ते थेट गोव्यापर्यंत पसरलेली आहे. नाशिक जिल्ह्यातून सह्याद्री आणि तिच्या उपरांगा धावतात. नाशिकातल्या अनेक दुर्गांची समुद्र सपाटीपासूनची उंची ४००० फुटांपेक्षा अधिक आहे. सह्याद्रीतील अत्युच्च शिखर कळसूबाई व सह्याद्री मस्तक:असं ज्याचं ऐतिहासिक वर्णन आहे तो सर्वांत उंच साल्हेर किल्ला हे दोनही मानबिंदू नाशिक जिल्ह्यातच आहेत. सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशा आभ्यासावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की, संपूर्ण कळसूबाई शिखर हे नाशिक जिल्ह्यात येतं. कळसूबाईच्या पायथ्याशी असलेलं बारी हे गांव अहमदनगर जिल्ह्यात असल्यामूळे कळसूबाई हे शिखर नगर जिल्ह्यात येतं असंच सांगितलं जातं. असो.
आता आपण नाशिकच्या गडकोटांची थोडी धावती ओळख करून घेऊन थेट माहिती घेऊ.
साधारण मालेगांव-सट्याण्याकडे सालबारी-डोलबारी म्हणून एक रांग सुटलेली आहे. अगदी सपाट अशा या भागात एकदम उठावलेले गगनचुंबी पर्वत दिसतात. त्यात साल्हेर (१५६७ मीटर) हा सह्याद्रीतला सर्वांत उंच किल्ला उभा आहे. ताहाराबादहून मुल्हरमार्गे साल्हेरला जाण्यासाठी वाहन किंवा एस. टी. बस मिळते. पायथ्याशी असलेल्या साल्हेरगांवातून किंवा वाघांबे गावातूनही या किल्ल्यावर जाता येतं. साल्हेरला चिकटूनच सालोटा हा किल्ला जोडलेला दिसतो. त्या दोघांच्या मधील खिंड गाठायची आणि साल्हेरच्या बाजूने काही पायवाट पार करून कातळातल्या पायर्‍यांच्या मार्गाने गडमाथा गाठावा. टोकावर परशुरामाचे मंदिर आहे. पाण्याची टाकीही आहेत. या शिखरावरून आजूबाजूला ३६० अंशातला पॅनारोमा डोळ्यात साठवायचा. ह्याच सालबारी मध्ये महत्त्वाचे मुल्हेर (१३०६ मी), मोरागड, हारगड (१३४० मी.), भिलाई (१०६०मी), पिंपळा (कंडाळ्या) (११३० मी), रतनगड (न्हावीगड) (१२५३ मी), मांगीतुंगी (१३२४-१३३१ मीटर) हे पर्वत आढळतात. पिंपळागड उर्फ कंडाळ्या हा किल्लाही साल्हेरच्याच परिसारतला, पाण्याची टाकी आणि गुहा असलेला व कातळमाथ्यावर खिंडारामुळे चटकन लक्ष वेधणारा किल्ला आहे. सटाणा-पिंपळनेर मार्गावर ताहाराबादहून मुल्हेरगांव अगदी रस्त्यावर आहे. मुल्हेरची चढाई तशी अवघड नाही. मुल्हेर माथ्यावर सुंदर अशा झाडांनी घेरलेले एक मंदिर आहे. पाण्याची टाकीही विपुल आहेत. गडमाथा विस्तिर्ण आहे. मुल्हेरला दुसरा गडमाथा आहे तो म्हणजेच मोरागड. मुल्हेरचा पसारा हा फार मोठा आहे. शेजारीच हारगड हा अलग किल्ला दिसून येतो. हारगडावर जाण्यासही मुल्हेर गावातूनच जावे लागते. मुल्हेर आणि हारगड एका खिंडीने जोडलेले आहेत. हारगडावर देवाचे स्थान असून एक मोठी तोफ आढळून येते. या परीसरातला रतनगड उर्फ न्हावी हा गड गाठण्यासाठी याच मार्गावरील दसवेल गावातून भिलवडमार्गे वडखेल गाठावे. या वलखेड गावातून रतनगडावर चढावे. न्हावी गडाहून मांगी-तुंगी सुळक्यांचे मनोहारी दृश्य दिसते. मांगी-तुंगी हे जैन धर्मीयांचे महत्त्वाचे ठाणे समजले जाते. मांगी-तुंगी म्हणजे एक भौगोलिक आश्‍चर्यत वाटतं. दोन उंच सुळके, त्यांना मधून जोडणारी एक अरूंद पायवाटेचा मार्ग, आणि या सर्व रचनेला उभं धरून ठवणार्‍या उतरत्या डोंगरधारा असं फारच मनोहारी. खालच्या गावात भगवान पार्श्‍वनाथांचं पुरातन मंदिर आहे. ट्रस्टने परिसर चांगलाच सुशोभित केलाय. खालपासून वरपर्यंत चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. वर गेल्यावर सुळक्यांच्या टोकाशी तर काही जाता येत नाही पण मांगी आणि तुंगी दोनही सुळक्यांच्या पायथ्याला गोलकार लेण्या कोरलेल्या आहेत. त्याला प्रदक्षिणा घालत सर्व मुर्तीना नमन करायचे आणि मांगी व तुंगी दोहोंतील अरुंद मार्गक्रमणाचा थरार मनात धरुन आणायचा. याच रांगेतला सटाणा-साल्हेर रस्त्यावरील साकोडे-दगडाचे या गावतून भिलाई हा किल्लाही बघून येण्यासारखा आहे. याच परिसरात भिलाई किल्ल्याच्या थोडं खाली चौल्हेर (११२८ मी) व प्रेमगिरी (८१० मी)-इंद्रमाळ असे किल्ले आहेत. चौल्हेरला जाण्यासाठी सटाण्याहून तिळवण गावी जावे. गावातून चौल्हेरवर जाण्यास मार्गस्थ व्हायचे. अनोखे प्रवेशद्वार व पायर्‍या हे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य. वरून गिरणा, पुणंद व आरम नद्यांची खोरी दिसतात तसेच शेजारीच असलेला लक्षवेधी दीरभावजय डोंगरही दिसतो. पुढचा किल्ला म्हणजे प्रेमगिरी. प्रेमगिरीला कळवणहून हिंगुळवाडीला जावे. प्रेमगिरी फारसा उंच नसला तरी वर रामकुंड, सीताकुंड व हनुमान मंदिर आहे. शेजारचा इंद्रमाळही लक्ष वेधून घेतो.
मालेगाव-सटाण्याच्या याच भागात दोधेश्वर परिसरात दुंधा (६९६ मी), कर्‍हा (९३७ मी), अजमेरा (८७० मी) व बिष्टा (बिजोटा) (१०३० मी) असे चार फारसे उंच नसणारे पण अनोख्या धाटणीचे किल्ले पटापट बघून होतात. दुंधा किल्ल्याला गोलाकार असलेल्या गुहा, गोरखचिंचेची झाडी आणि पाण्याची टाकी वैशिष्ट्यपुर्ण आहेत. याच रांगेतले पिसोळगड , डेरमाळ (१०७६ मी), कंक्राळा आणि गाळणा यांना दुरावा देऊन चालणार नाही. पैकी पिसोळ व डेरमाळला जाण्यासाठी नामपूरहून चिराई मार्गे बिलपुरी गावातून किंवा ताहाराबादहून जायखेड्यातून वाडी पिसोळ, टिंघरी या गावातून वर चढण्यास मार्ग आहे. बर्‍यापैकी अवशेष शिल्लक असलेला पिसोळगड व त्याचा उंच कडा वेगळा आनंद देणारा आहे. मालेगाव परिसरात माळमाथा म्हणून संबोधल्या जाणार्‍या भागात डोंगराळे, लुल्ला, गरबड ह्या गावांच्या पुढेच कंक्राळा गाव आहे. फार उंच चढाई नसली तरी वर कंक्राळा किल्ल्याचे बुरुज- तटबंदी बघून त्याचे महत्व लक्षात येते. या भागातला आता राहिला तो गाळणा’ (७१० मी). मालेगावहून गाळण्याला पोहोचणे काहीही कठिण नाही. खालून बघितल्यावर अजिबातच उंच वाटत नसला तरी संपूर्ण माथा तटबंदी-बुरूजांनी वेढलेली दिसून येतो. नाशिक जिल्ह्यातला सर्वाधिक अवशेष आणि वास्तू शिल्लक असणारा किल्ला म्हटलं तर गाळणाहेच नांव प्रथम घ्यावं लागेल. यावरून गाळण्याची भेट किती महत्त्वाची आहे ते आपल्या लक्षात येईल. गाळण्यावर स्वत: जाऊन या असा आग्रहच मी आपल्याला करीन. या मालेगाव-सटाणा परिसरातल्या एकेका किल्ल्यावर आणि गाळण्यावर भौगोलिक आणि ऐतिहासिक विस्ताराने लिहीण्यासारखे भरपूर आहे पण आज ही फक्त धावती ओळख.
नाशिक जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची पर्वतरांग म्हणजे सातमाळा रांगहोय. नकाशावर सातमाळा रांग ही नाशिकच्या गळ्यात हार घातल्यासारखी दिसून येते. सापूतर्‍याकडून वणी, चांदवड ते मनमाडपर्यंत सातमाळेचा पसारा पसरलेला दिसतो. नाशिकच्या बाहेर पुढे हीच रांग अंजिठा रांगेला मिळते. नाशिकहून सापुतार्‍याला जातांना ६-७ किमी अगोदरच हातगड (१११४ मी) लागतो. अगदी रस्त्यातच असलेला हातगड खालूनच ओळखू येतो. फार उंच नाही पण मथ्यावर बरेचशे अवशेष आजही शिल्लक आहेत. एकांडा उभा असलेला टेहाळणी बुरूज, तटबंदी, खोल्या, जोती, पाण्याची टाकी असे अनेक अवशेष बघायला धमाल येते. सापुतार्‍याला फिरण्यास आलात तर हातोहात हातगड ठोकून येण्याचा बेत आखण्यास हरकत नाही. हातगडपासून थोडं वणीकडे सरकलं की अचला आणि अहिवंत (१२२३ मी) असे दोन दुर्ग शेजारी शेजारी वसलेले आहेत. वणी-सापुतारा रस्त्यावरील पिंपरीअचला हा अचला गडाचा पायथा. अचलागडाच्या मथ्यावरून पश्‍चिमेचा तौला डोंगर तसंच पुर्वेकडे अहिवंत व सप्तश्रृंगी पर्वताचं उत्तम दर्शन होतं. पुढचा किल्ला अहिवंत. वणीहून नांदूरीला जातांना गाडीचा रस्ता एका डोंगर खिंडीतून जातो. या खिंडीच्या उजवीकडे आहे तो किल्ले अहिवंत. अचल्या कडूनही किंवा पलिकडच्या दरेगावातूनही यावर वाट जाते. अहिवंत किल्ला फिरण्यासाठी फारच विस्तीर्ण पसरलेला असून वर पाणीही आहे. सातमाळेतला धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा असा साडेतीन शक्तिपीठाधीश्वरी महिषासुरमर्दिनी देवीचा सप्तश्रृंगगड (१४१६ मी). हा सर्वांना परिचित पण वणीकडच्या पाठमोर्‍या बाजूने रडतोंडीच्या पायर्‍यांनी चढण्याची मजा काही औरच. देवीच्या समोरील किल्ले मार्कंडेय (१३३६ मी). वणीहून मार्कंडेयच्या पायथ्यापर्यंत वाहने येतात. शंकराच्या पिंडीप्रमाणे आकार असलेला अनोखा दुर्ग. सोमवती आमावस्येला हजारोंच्या संख्येने भाविक येतात, यात्रा भरते. याच्या पुढे सातमाळेतला रावळ्या-जावळ्या (१३३२/१२३६ मी) हा जोड किल्ला उभा आहे. मार्कंडेयच्या खिंडीतूनच यांची वाट फुटते. विस्तीर्ण पठार आणि त्यावर उभे असलेले रावळ्या-जावळ्या देखणे आहेत. इकडेच थोडा आडमार्गावर कण्हेरागड (११०० मी) आहे. कण्हेरागडाला नाशिकहून नांदूरीमार्गे जाणारी कळवण बस धरायची आणि ओतुरला उतरून पायथ्याच्या कण्हेरवाडीला जायचे. हा किल्ला म्हणजे शुरयोद्धा रामाजी पांगेरा हे लढतांना पडले ते धारातीर्थ आहे. पुन्हा आपण रावळ्या-जावळ्याहून पुढे सातमाळ्यातल्या प्रवासाला निघू. पुढचा शिलेदार आहे धोडप (१४५१ मी). धोडप किल्ला आपल्या विशिष्ट आकारामुळे दुरवरून ओळखायला येतो. पातळ पण उंच अशी कातळभिंत आणि त्यात असलेली चौकोनी खाच ही धोडपची ओळख आहे. नाशिकचा नकाशा घ्यायचा आणि नाशिक-आग्रा महमार्गावरील वडाळीभोई गावापासून साधारण ७-८ किमी अंतरावर असलेल्या धोडंबे गावाला लागून उभ्या असलेल्या धोडप किल्ल्यावर करकटक ठेवायचं, आपल्या लक्षात येईल की हाच नाशिक जिल्ह्याचा मध्यबिंदू होय. धोडपवर फार फिरण्यासारखे आहे. याचा विस्तार, टाकी, गुहा, बुरुज, मंदिर सगळं काही बघता येतं. सातमाळेतला पुढचा आहे तो किल्ले कांचना. कांचना (११३४ मी) नाशिकहून देवळ्याला जातांना लागणार्‍या कांचनाबारीत खडा ठाकलेला आहे. वरच्या बाजुला कातळ कोरून केलेल्या पायर्‍या व रचनेमुळे अनोखा झालेला कांचना गिर्यारोहकांना खुणावत असतो. त्या पुढचे कोळधेर (१२२० मी), राजधेर (१३४४ मी), इंद्राई (१३७० मी) व चांदवड (११९९ मी) असे चार प्रमुख किल्ले चांदवड परिसराला घेरून उभे आहेत. कोळधेर दोर लावून चढावा लागतो. राजधेरचीही तिच परिस्थिती होती पण तुटलेल्या पार्‍यांच्या ठिकाणी आता लोखंडी शिडी बसविण्यात आलेली असल्याने सोपे झाले आहे. इंद्राईची भटकंती मस्तच आहे. पावसाळ्यात तर स्वप्नात फिरून आल्यासारखं वाटतं. लेण्यांसदृश्य गुहा, टाकी, शिवमंदिर, आणि बरंच काही इंद्राईवर धुंडाळता येतं. चांदवड किल्ला तर ऐतिहासिक महत्त्वाचा आहे.
आपण पुढे मनमाडकडे सरकू. मनमाड नजिकचा वेगळ्या रचनेचा अंकाई-टंकाई हा जोडकिल्ला प्रसिद्ध आहे. अंकाई व टंकाई या दोहोंतील उतरत्या खिंडीवरील तटबुरुजांचे वरपर्यंत असलेले बांधकाम अनोखं आहे. अगस्ती ऋषीचे तपस्थल, दर्गा व अनेक बांधकामावशेष आढळतात. अणकाईच्या लेण्याही उत्तम आहेत. अणकाईवरून खाली जाणारी रेल्वे बघण्याची मजाही निराळी. मनमाड परिसरात मेसण्या, माणिकपुंज, कनकगिरी (कांत्रा), जातेगाव (महादेव डोंगर) ह्या किल्ल्यांची भटकंतीही तितकीच महत्त्वाची आणि रंजक आहे. पण लेखन विस्तार थोडा आटोक्यात ठेवत आहे.
नाशिकच्या गड यादीत त्र्यंबकेश्वर रांगेचा उल्लेख टाळून तर आजिबातच चालणार नाही. नाशिककरांना सगळ्यात जवळ असलेली पर्वतरांग. त्र्यंबकच्या वाटेवरचा अंजनेरीगडावर (१३०० मी) तर मुक्त भटक्यांचा कायमच राबता असतो. अतिविस्तीर्ण पठार, पाण्याची मुबलकता, धार्मिक व ऐतिहासीक महत्त्व, चढाईसाठी अनेक बाजूंनी वाटांचा पर्याय अशा अनेक गोष्टी आपल्याला अंजनेरीवर सतत घेऊन जात असतात. अंजनेरी गावाच्या जवळच असलेल्या मुळेगावच्या पुढे जातेगाव लागते तिथे रांजण्या म्हणजेच रांजणगड (८५० मी) हा आडवाटेवरचा फार कुणीही फिरकत नसलेला टुमदार किल्ला आहे. बाकी त्र्यंबकरांगेतला महत्त्वाचा श्रीगड उर्फ ब्रह्मगिरी (१२९५ मी). ज्याने पाहिला ब्रह्मगिरी त्यास नाही यमपुरीया उक्ति प्रमाणे प्रत्येकजण गोदावरीच्या उगमस्थळाचे तीर्थ प्राशन करायला एकदा तरी जाऊन आलेलाच असावा. त्र्यंबक-सफाळे रस्त्यावर टाकेहर्षच्या पुढचा निरगुडपाडा हा हरिहर (११२० मी) किल्ल्याचा पायथा. त्रिकोणी प्रिझमच्या आकाराचा आणि अनोखी रचना असलेला खड्या शिडी पायर्‍यांचा जबरदस्त गड. शेजारील फणी डोंगरावरचा (९९२ मी) भला मोठा कातळही फार छान दिसतो. भास्करगड उर्फ बसगड (१०८६ मी) याचाही मार्ग इथुनच फुटतो. फार उंच नसला तरी माथ्यावरून वैतरणेच्या जलाशयाचा नजारा बघण्यासाठी याचीही भेट जरूरी ठरते.
त्र्यंबकच्या पुढे इगतपुरीच्या रांगेत कावनई व त्रिंगलवाडी हे छानशे गड बसलेत. कावनई हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून चांगलेच नांवरूपास आले आहे. तिथलाच हा कावनई किल्ला फार उंच नाही पण माथ्यावरील पाण्याचे तळे बघण्यासारखे आहे. त्रिंगलवाडी हे इगतपुरीच्या मागचे गाव. येथे असलेल्या किल्ल्यात काही लेणी आहेत. किल्ल्यावरून लांबच लांब निरीक्षण करता येते.
नाशिक जिल्ह्यातल्या पेठ या आदिवासी दुर्गम भागात वाघेरा (१०५० मी), खैराई (७०० मी), सोनगिरी (६७० मी) हे गडत्रयी भेटीसाठी आमंत्रित करत असतात. नाशिकहून गिरणारेमार्गे हरसूलच्या रस्त्यावर वाघेरा आपले स्वागत करतो. वाघेरा गावातून सोप्या चढाईने एक छोटा दगडी टप्पा ओलांडत माथा गाठायचा. वाघेर्‍याच्या माथ्याहून पश्‍चिमेच्या खोल दर्‍यांचे व कोकण प्रांताचे दृश्य प्रेक्षणिय दिसते. पेठहून तोंडवळ गावापशी वसलेला सोनगिरी आणि हरसूलच्या ठाणापाडा जवळील खैराई हे चुकवू नये असे किल्ले आहेत. वीकएण्डला येथे जाण्याचा बेत आखण्यास हरकत नाही.
नाशिकची रौद्र-राकट अशी कळसूबाई रांग ही आख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना आकर्षित करते. अत्त्युच्च शिखर कळसूबाई (१६४६ मी) भंडारदर्‍याच्या रस्त्यावरील नगर जिल्ह्यातील बारी गावापासून गाठावं आणि मजल दरमजल करत कळसूबाई माथ्यावरचा अत्त्युच्च आनंद मिळवायचा. अलंग (१४७९ मी), मदन (१४६६ मी), कुरंग (१४७० मी), हे कळसूबाईच्या शेजारचे मानाचे व दुर्गम कोट आहेत. सराईत गिर्यारोहक यांच्याकडे आव्हान म्हणून बघतात. कारण, यावर जाण्याचा मार्ग ब्रिटीशांनी तोडून ठेवला आहे. त्यामुळे काही पॅचेसवर प्रस्तरारोहण करूनच वर पोहोचावे लागते. मोरधन (१०५२ मी) हा अजून एक शिलेदार घोटीहून अगदी जवळ आहे. मोरधनला जाण्यासाठी भंडारदरा मर्गावर देवळेमार्गे खैरगावला पोहोचावे. चांगलाच लांबलचक माथा आणि वेधक दृश्य दाखविणारा हा किल्ला एकदिवशीय यादीत घालायलाच पाहिजे.
पुढची पर्वतरांग आहे ती औंढापट्टा रांग. यात पट्टा उर्फ विश्रामगड (१३९१ मी) हा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला मोठा किल्ला आहे. पट्टा किल्ल्यावरचा अंबारखाना आजही चांगल्या स्थितीत उभा आहे. सिन्नरहून ठाणगावमार्गे पट्टेवाडीतून विश्रामगाडावर जाता येतं. घोटीहूनही असग रस्ते येतात. शेजारचा अवंढा (१३२० मी), आडगड (१२३४ मी), आणि बितनगड (१०८५ मी) हे किल्ले सवडीने एकेक करून चढून यायचे. सिन्नरच्या क्रोशीतले सोनगड (८५० मी), प्रतापगड (८५०मी), डुबेरगड (८००मी) फार दमवणारे नाहीत पण आनंददायक आहेत.
सारखं लांब जायला जमत नाही मग भटक्यांना प्रश्‍न पडतो जवळ काय?, आपल्या घराजवळच आणि सकाळी निघालो की दुपारी परत असे पण किल्ले नाशिकशहराने आपल्या जवळ ठेवलेले आहेत. नाशिकहून पेठ रस्त्यावरील जवळच असलेला रामशेज (९८५ मी) हा अनेक जणांचा पाठ असेल. सपाट अशी माची असलेला हा दुर्ग संपुर्ण शहरातून कुठूनही दिसतो, त्याच्याच बाजूचा भोरगड सध्या एअरफोर्सच्या ताब्यात असला तरी त्याच्या देहरी (१०९२ मी) म्हणून भागात पाठमोरी चढाई शक्य होते. बहुला (९५६ मी) , रायगड हे दोन दुर्ग मिलिटरीच्या ताब्यात सुरक्षित आहेत. विशेष परवानगीने ते शक्य होते. महामार्गावरील वाडीवर्‍हे पासून जवळ गडगडसांगवी गावचा घरगड (गडगड्या) (९६२ मी) अर्धाधिक दिवस देऊन जाण्यासारखा आहे. वरील टप्प्यात थोडं सोप्या पद्धतीचं क्लायबिंग आहे. घरगडावरून पाठमोरा अंजनेरी, डांग्या सुळका अगदी जवळ दिसतात. वरील गडकिल्ल्यांची यादी ही अगदीच धावत-पळत आपल्यासमोर ठेवलेली आहे तरी ही गिर्यारोहकाच्या सततच्या भटकंतीने आणि आभ्यासाने सिद्ध झालेली आहे. वरील किल्ल्यांच्या नामावळीतले बिष्टा, भिलाई, अजमेरा, मेसण्या, जातेगांव, प्रेमगिरी, पिंपळागड, डुबेरगड, मोरधन व सोनगिरी हे कुठल्याही गॅझेटियर किंवा पुस्तकांत उल्लेख नसणारे किल्ले इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी प्रकाशात आणले तर रांजणगड व दुंधा हे किल्ले गिर्यारोहकांच्या यादीत सामाविष्ट करण्याचे काम प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद पाळंदे यांनी केले हे मी येथे नमुद करू इच्छितो. त्यामुळे आपल्या भटकंतीसाठी गडकोटांची यादी आधिकच मोठी होत चालली आहे.

जाता जाता नाशिक शहराचे द्वारपाल पांडवलेणी, चामरलेणी यांचा उल्लेख केला नाही तर काहीतरी विसरल्यासारखं होईल. ह्या नाशिकच्या सर्वांत पुरातन जागा किंवा वारसाच आहे असं म्हटलं तर वावगं नसावं. अहो, मुंबईकडून येणार्‍या महामार्गाला नाशिकशहरात प्रवेश देतांनाच दोन डोंगरांच्या घळीतून यावं लागतं, तिथंच नाशिकचं दुर्गसाम्राज्य जाणवतं.

साभार: सुदर्शन कुलथे

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक पुस्तके Download करण्यासाठी Websites

ऐतिहासिक पुस्तके Download करण्यासाठी Website. नमस्कार , मी येथे विविध कालखंडातील इतिहासिक पुस्तके download करण्यासाठी website च्या link द...